भुसावळ – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वत्र निवडणूक वातावरण तापले असून भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते उपस्थित होते.
पाटील यांनी सांगितले की,भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व कामकाज नियोजनबद्ध रितीने सुरू असून अंतिम मतदार यादी तयार झाली आहे. शहरातील १९१ मतदान केंद्रांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून ज्या ठिकाणी किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे, तेथे तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८०० ते १००० मतदार राहणार असून मतदानाच्या दिवशी नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर आदर्श मतदान केंद्र, महिला विशेष केंद्र, युवा केंद्र आणि दिव्यांग केंद्र अशी विविध संकल्पना राबवण्यात येणार आहेत.मतदानाचा अनुभव सुकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षेच्या दृष्टीने शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून फिरते व्हिडिओ चित्रणही केले जाणार आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या चार प्रमुख रस्त्यांवर स्थिर सर्वेक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत.
स्थिर सर्वेक्षणकेंद्रे
१. टी-पॉईंट (जळगाव रोड)
२. यावल नाका (यावल रोड)
३. सुंदरनगर (वरणगाव रोड)
४. विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर (जामनेर रोड)
निवडणुकीच्या संपूर्ण कामकाजासाठी सुमारे १२०० कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, एनएसएस, स्काऊट-गाईड व एनसीसी विद्यार्थी यांची मदतही घेण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणेसंदर्भातील सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
मतदान साहित्याचे वाटप तहसील कार्यालयाच्या आवारातच केले जाणार असून, मतदानानंतर सर्व ईव्हीएम यंत्रे व व्हीव्हीपॅट या आवारातील शासकीय धान्य गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. मतमोजणीही त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी दाखल करताना पक्षीय उमेदवारांसाठी एक सूचक, तर अपक्ष उमेदवारांसाठी पाच सूचक आवश्यक राहणार आहेत. निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि भयमुक्त पार पडाव्यात यासाठी शहरातील काही विघ्नसंतोषी व टवाळखोरांवर हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार केल्याचे पाटील यांनी सांगितले.
शहरात दोन ठिकाणी खाजगी जागांवर मतदान केंद्र ठेवण्यात आले असून त्यापैकी एक खडका रोडवरील मिल्लत नगर भागातील बागवान समाज सभागृहात राहणार आहे.
भुसावळ नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, पारदर्शक व निर्भय निवडणूक पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना हाती घेतल्याचे प्रांताधिकारी पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.




































