भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले आहे. भुसावळ येथील जिल्हा व तिसरे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी रविवारी (ता. १) निकाल देत आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न व हत्या हे आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले. शिक्षेबाबतचा युक्तिवाद सोमवारी (ता. २) होणार असून आरोपीस फाशी की जन्मठेप, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रभावी बाजू मांडत २३ साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचा निर्णय दिला.
असा उघडकीस आला थरारक गुन्हा
बोरखेडा गावातील मेताब भिलाला पावरा हे कुटुंबीयांसह मध्यप्रदेशात नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. घरात सविता (वय १३), राहुल (११), अनिल (८) आणि सुमन (६) ही चार लहान मुले एकटी होती. दरम्यान, १६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी शेजारी मुस्तफा शेख यासिन शहा यांनी घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता घरात चारही बालकांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले.
घटनास्थळी कुऱ्हाड पडलेली होती. बालिकेच्या गळ्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न उघड होण्याच्या भीतीतून हत्याकांड
तपासात आरोपी महेंद्र बारेला हा मृत मुलांचा परिचित असल्याचे समोर आले. त्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिच्या भावंडांना जाग आल्याने प्रकार उघड होण्याची भीती निर्माण झाली. त्यातून आरोपीने संतापाच्या भरात चारही बहीण-भावांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला.
या अमानुष हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. आता दोषसिद्धीनंतर आरोपीला कोणती शिक्षा सुनावली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



































