भुसावळ : शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरून भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नगरसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत. शहराच्या विकासकामांना मुद्दाम अडथळे निर्माण केले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना भंगाळे म्हणाल्या की, नगरपालिकेच्या बैठकीत वारंवार गोंधळ घालून कामकाजात अडथळे आणले जात आहेत. माईक हिसकावून घेणे, निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, “मी सामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळे मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
शहराच्या विकासासाठी आपण विविध मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगत, त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. जनतेच्या आशीर्वादाने विकासकामे पुढे नेत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक सचिन चौधरी यांनीही भाजपवर टीका करत, भुसावळचा खरा विकास संतोष चौधरी यांच्या कार्यकाळात झाल्याचा दावा केला. तर उल्हास पगारे यांनी भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून विकासकामे थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
दरम्यान, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे भुसावळच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा वाद थांबून प्रत्यक्ष विकासकामांना गती मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.




































