भोर तालुक्यातील किकवी येथे शेळ्यांसाठी चारा आणताना विजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश रामय्या भंडारी (वय अंदाजे २३, रा. किकवी, ता. भोर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भंडारी हे शेळीपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी (दि. १०) दुपारी ते शेळ्यांसाठी चारा घेण्यासाठी गावाजवळील झाडावर चढले होते. यावेळी झाडाची फांदी महावितरणच्या वीजतारेस लागल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांना कळवले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वीजतारेच्या जवळ झाडावर चढल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर वीजतारांच्या सुरक्षित अंतराच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली असून, नागरिकांकडून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.




































