अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये; विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन
भुसावळ – अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात भुसावळ शहरात बुधवार, दि. २२ जुलै रोजी ‘एल्गार महामोर्चा’ काढण्यात आला. भर पावसातही मोठ्या संख्येने आंदोलक या महामोर्चात सहभागी झाले. नाहाटा कॉलेजपासून सुरू झालेला हा मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती,भुसावळ तालुका व शहराच्या वतीने आयोजित या महामोर्चात विविध सामाजिक, राजकीय तसेच आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत शासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भर पावसातही आंदोलकांचा उत्साह आणि आंदोलनाची तीव्रता कायम राहिली.
उपवर्गीकरणाला विरोध; शासनाकडे विविध मागण्या
महामोर्चानंतर उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांना निवेदन देण्यात आले. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचा विचार करता अनुसूचित जातींमध्ये परस्पर मागासलेपण सिद्ध करणारा आवश्यक अभ्यास किंवा आकडेवारी उपलब्ध नसल्याने उपवर्गीकरणाची आवश्यकता नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला.
याशिवाय खासगी क्षेत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करावे, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे प्रमाण वाढवावे, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजनांचा निधी वाढवावा आणि तो इतर योजनांकडे वळवू नये, अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचा विविध शासकीय विभागांतील अनुशेष विशेष भरती मोहिमेद्वारे तातडीने भरावा, सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार व संविधानिक आरक्षणाच्या संधी अबाधित ठेवण्यासाठी सरसकट खासगीकरणाला प्रतिबंध घालावा, अशीही मागणी करण्यात आली.
हे निवेदन उपविभागीय अधिकारी अधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले असून राज्यपाल, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री, मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आले आहे.
या महामोर्चाचे नेतृत्व राजू सूर्यवंशी, गणेश सपकाळे, बाळा पवार, जगन सोनवणे, शाताराम जाधव, बाळा मोरे, सुधीर जंजाळे, उन्हास पगारे, बाळा सोनवणे, सुमंगल अहिरे, रवींद्र, संदीप सावळे, ॲड. धनराज मगर, बाळू सोनवणे, वाल्मिक देहाडे, मुना सोनवणे आणि विजय सावळे यांनी केले.



































