भुसावळ : येथील नगरपालिकेतील विकासकामे अचानक थांबवण्यात आल्याने भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला.यावरून गुन्हे दाखल करण्याची भाषा करणे हे दबावतंत्र असल्याचा आरोप भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी केला. मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केले. नगराध्यक्षपदी महिला विराजमान झाल्याचा आदर आम्हाला आहे; मात्र शहराच्या विकासकामांवर राजकारण होऊ नये, असे लोणारी म्हणाले.
भुसावळातील मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत लोणारी यांनी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. लोणारी म्हणाले की, नगराध्यक्षांनी केलेली वक्तव्ये स्क्रिप्टेड असून त्यांना लिहून दिलेलेच वाचण्यात आले. शहरात चुकीची कामे होत असतील तर भाजप त्याला विरोध करणारच असून शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही डगमगणार नाही.
अमृत योजनेअंतर्गत संतोषी माता मंदिराजवळील जलकुंभाचे काम तीन महिन्यांपासून सुरू असताना मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने अचानक बंद करण्यात आले. भुसावळकरांना वेळेवर पाणी मिळणे हा आमचा प्राथमिक उद्देश असून यावर राजकारण करण्यास आम्ही कधीच परवानगी देणार नाही, असेही लोणारी म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, शंभर गुन्हे दाखल झाले तरी भाजप घाबरणार नाही आणि चुकीच्या कामांना विरोध सुरूच राहील.
अधिकाऱ्यांना जाब विचारणे सुरूच राहील – किरण कोलते
भाजप दक्षिण विभागाचे शहराध्यक्ष किरण कोलते म्हणाले की, शहराच्या विकासासाठी भाजपाचे सहकार्य कायम राहील; मात्र चुकीच्या कामांबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणे सुरूच राहील. जाब विचारताना नगराध्यक्षांचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
घेराव म्हणजे दबाव नव्हे – परीक्षीत बऱ्हाटे
अमृत जलकुंभाचे काम अचानक बंद करण्यात आल्याने भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.हा प्रकार दबाव टाकण्याचा नसून शहरवासीयांच्या पाणी प्रश्नासाठी आहे, असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व उपगटनेते परीक्षीत बऱ्हाटे म्हणाले. पालिकेच्या एनओसीनंतरच काम सुरू झाले होते, त्यामुळे अचानक काम बंद करणे म्हणजे शहरवासीयांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक २२ मधील अल्पसंख्यांक भागासाठी मंत्री संजय सावकारे यांनी ५० लाखांचा निधी दिल्याची माहिती दिली.मंत्री सावकारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासकामांची घौडदौड सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गटनेता युवराज लोणारी, उपगटनेता परीक्षीत बऱ्हाटे, किरण कोलते, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर निक्की बत्रा, विशाल नाटकर, सुजित भोळे, संदीप सुरवाडे, अॅड. बोधराज चौधरी, बापू महाजन, देवा वाणी,कैलास चौधरी, प्रशांत नरवाडे,बाळा सोनवणे, रुपेश देशमुख, अल्बर्ट तायडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



































