८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांनी संतप्त भूमिका घेत ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांकडे निवेदन सादर करत प्रशासनालाच जाब विचारला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भुसावळ शहरातील अमृत पाणीपुरवठा योजना तब्बल आठ ते दहा वर्षांपासून संथ गतीने रेंगाळत असून अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. सुरुवातीला ९० कोटींची असलेली ही योजना आता १३५.७६ कोटींपर्यंत फुगली असतानाही कामाचा दर्जा आणि गती यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाईपलाईन टाकताना निकृष्ट काम झाल्याचा आरोप असून मंजूर ६५ हजार पाणी कनेक्शनपैकी अनेक नागरिक अजूनही वंचित असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
नगराध्यक्षांनी ठेकेदार आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताचा गंभीर आरोप करत शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. संबंधित ठेकेदारांची मक्तेदारी रद्द करून नवीन ठेकेदार नेमावा, प्रलंबित बिलांचे देयक थांबवावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, शहरातील विविध विकासकामांना विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून स्थगिती मिळविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही कामे सर्वसाधारण सभेत मंजूर असून त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छता व्यवस्थेवर ताण येत असून मनुष्यबळ अपुरे पडत आहे. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने या विषयावरही तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
भुसावळच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हद्दवाढ प्रस्ताव मंजूर करून नव्या भागांना मूलभूत सुविधा देण्याची गरज नगराध्यक्षांनी अधोरेखित केली. तसेच एमआयडीसीमध्ये मोठा औद्योगिक प्रकल्प मंजूर करून १००० ते २००० युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पाणी, स्वच्छता, विकासकामे आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा नागरिकांचा रोष उफाळून येईल, असा इशाराच नगराध्यक्षांनी दिला आहे.




































