यावल नगरपरिषदेत नागरिकांनी वेळोवेळी अस्वच्छतेच्या, घाणीच्या तक्रारी करून देखील त्यांची दखल घेतली जात नाही..

पोलीस वार्ता, भुसावळ : यावल शहरातील नगरपरिषद सध्या नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यास असमर्थ असून नागरिकांनी वेळोवेळी अस्वच्छतेच्या, घाणीच्या तक्रारी करून देखील त्यांची दखल घेतली जात नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपरिषद मुख्य अधिकारी हे कार्यालयात उपस्थितच नसतात ते नेहमी दौऱ्यावर बाहेर असल्याचे नागरिकांना सांगण्यात येते, तसेच नगरपरिषद आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने ते व्यवस्थित काम करत नाही, मनमानी करतात यामुळे नागरिकांमध्ये नगरपरिषदेविषयी तीव्र नाराजी पहायला मिळत आहे.
यावल शहरात बाजारपेठेत एकमेव पुरुषांसाठी मुतारी/स्वच्छतागृह आहे. परंतु नगरपरिषद आरोग्य विभागाकडून त्याची कुठलीही साफसफाई केली जात नाही. त्यामुळे तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून याचा दुर्गंध परिसरात पसरला आहे. यामुळे बाजारातील दुकानदार तसेच व्यापारी वर्ग आणि जवळील धार्मिक स्थळ सगळेच त्रासले असून नगरपरिषदेच्या आरोग्य अधिकारी व सफाई कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. तसेच शहरात प्रमुख रस्त्यांवर घाणीचे, कचऱ्याचे ढीग पहायला मिळतात. शहरातील इतर ठिकाणी असलेल्या मुतारी, स्वच्छतागृह, शौचालयांची वेळोवेळी साफसफाई होत नसून तिथे देखील दुर्गंधीमुळे नागरिक रोगराईच्या व दुर्गंधीच्या वातावरणात राहत आहे. परंतु नगरपरिषद सफाई कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.






































