राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मान्यता मिळाली आहे. एकूण 14 हजार 80 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवता येईल.
पोलीस वार्ता, पुणे : जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रूपांतरित करण्यासाठी 438 कोटी 48 लाख रुपयांच्या कामाला मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली. या निर्णयामुळे दौड, बारामती व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. पाण्याची बचत होईल आणि जलसंचयनाचा प्रभावी उपयोग होईल. यामुळे पाण्याचा उपयोग अधिक कार्यक्षम होईल आणि सिंचन क्षेत्र वाढवून एकूण 14 हजार 80 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवता येईल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे त्या भागातील कृषी विकासाला चालना मिळेल.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मान्यता मिळाली आहे. योजनेत 47 तलावांचा समावेश आहे. त्यापैकी 32 तलाव पाण्याने भरले जातील, या योजनेअंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 94 किमी अंतरावर वरवंड तलावात पाणी सोडले जाते. तेथून उपसा करून 8 हजार 350 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. या योजनेत एकूण 18 तलाव समाविष्ट असून, सध्या 13 तलाव पाण्याने भरले जात आहेत. शिरसाई उपसा सिंचन योजनेंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 138 किमी अंतरावर शिर्सुफळ तलावात पाणी सोडले जाते. तेथून उपसा करून 5 हजार 730 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
यात भूसंपादनाची गरज राहत नाही. तसेच मशागतीस कोणताही अडथळा येत नाही. नलिका वितरणाद्वारे समन्यायी पाण्याचे वाटप करणे सुलभ होते. नलिका वितरण प्रणालीचा देखभाल दुरुस्ती व परिचतनाचा खर्चही तुलनेने कमी राहतो. डोंगर उतारावरील, खोल खोदाईतील व काळ्या मातीतील कालव्यांवर तुलनेने देखभाल-दुरुस्तीचा खर्च जास्त राहतो. खडकवासला प्रकल्पातून या योजनेस पाणी मिळते. तरी, या योजना बंदिस्त नलिकेमध्ये रुपांतरीत केल्याने पाण्याचा कार्यक्षम वापर होणार आहे. तसेच पाण्याची बचत होऊन पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यामुळे खडकवासला प्रकल्पावर येणारा ताण यामुळे कमी होणार आहे.






























