महाराष्ट्र राज्यातील जालन्यात विविध मागण्यांसाठी एका शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोखं आंदोलन केले. नायबराव गोंडगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.काही लोकांनी बेकायदेशीररित्या बनवून घेतलेल्या गोंडगे यांच्या जमिनीचा 7/12 रद्द करून जमीन शेतकरी गोंडगे यांच्या नावावर करून देण्याची मागणीसाठी जालन्यात एका शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत गाडून घेऊन अनोखं आंदोलन केले.

शेतकरी नायबराव गोंडगे हे आपल्या कुटुंबासह मंठा तालुक्यातील गेवराई येथे राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेजमीन सर्वे नंबर 18, गट नंबर 61, 62 आणि 63 मध्ये आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत काही लोकांनी या जमिनीचा काही भाग बेकायदेशीररित्या (डुप्लिकेट नोंदणी करून) सर्वे नंबर 14, 15, 19 आणि 40 या नावाने इतरांच्या नावे नोंदवून शेतजमीन हडप केल्याचा आरोप शेतकरी गोंडगे यांचा आहे. “आमच्या कुटुंबातील कुणीही जमीन विकलेली नाही; तरीही काही लोकांनी बेकायदेशीररित्या ती त्यांच्या नावे करून घेतली,” असा दावा शेतकरी गोंडगे यांनी केला आहे. त्यामुळे स्वतःची जमीन परत मिळावी, या मागणीसाठी त्यांनी चक्क स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केलंय. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतलं. मात्र त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची सध्या संपूर्ण गावात चर्चा आहे. दरम्यान, मागणी लवकर मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे .
पोलीस वार्ता मध्यप्रदेश हेड रमाकांत मोरे




































