शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा घेणार
भुसावळ, दि. २६ नोव्हेंबर ,स्वतंत्र भारत परिवार, भुसावळ हा गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने शहराच्या विकासासाठी कार्यरत असलेला स्वयंसेवी संघटनेचा परिवार आहे. जात-पात, धर्म, श्रीमंत-गरीब, शिक्षित-अशिक्षित असा कोणताही भेदभाव न मानता हा परिवार कार्य करतो. २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या परिवाराच्या सुमारे ५५० हून अधिक सदस्यांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत हजारो मतदारांना मतदानासाठी प्रेरित केले होते.
आता भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने स्वतंत्र भारत परिवाराने शहराच्या जलद व सर्वंकष विकासासाठी २४ महत्त्वाच्या मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा निवडून येणाऱ्या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असून, पुढील पाच वर्षांत या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी परिवार सातत्याने पाठपुरावा व सहकार्य करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वतंत्र भारत परिवाराच्या २४ प्रमुख मागण्या :
1. भुसावळकरांना दररोज पुरेसे व शुद्ध पाणी मिळेल याची त्वरित व्यवस्था करावी.
2. रस्ते व इतर बांधकामे टिकाऊ व दर्जेदार व्हावीत यासाठी कंत्राटे केवळ पात्र ठेकेदारांना द्यावीत; ठेकेदाराचे नाव, मोबाईल क्रमांकासह माहितीफलक लावावा.
3. भुसावळ MIDC मध्ये नवीन उद्योग-प्रकल्प आणण्यासाठी पूर्ण ताकद लावावी; प्रकल्पांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
4. गो-रक्षकांसाठी गोशाळा उभारण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी.
5. शहरातील अवैध कत्तलखाने व उघड्यावर मास विक्री त्वरित बंद करावी.
6. भुसावळ जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा.
7. शहराचा सुबक विकास आराखडा तयार करून रुंद-स्वच्छ रस्ते, सुशोभित चौक, कारंजे आदी सुविधा उपलब्ध कराव्यात.
8. स्थलांतर थांबविण्यासाठी उत्तम शैक्षणिक संस्था, शेती-विकास प्रकल्प व औद्योगिक विकासावर भर द्यावा.
9. सुजाण नागरिकांशी सातत्याने जनसंपर्क ठेवावा.
10. शहरातील गुन्हेगारी पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.
11. भटके कुत्रे व ढोर यांचा योग्य बंदोबस्त करावा.
12. तापी नदी पुलावर आत्महत्यांना आळा घालण्यासाठी संरक्षक जाळी बसवावी.
13. नाहाटा चौफुलीजवळील जुन्या धोकादायक पाण्याच्या टाकीची त्वरित पाडापाड करावी.
14. नगरपालिकेची नवीन आधुनिक इमारत, अत्याधुनिक रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध करावी.
15. नगरपालिका क्षेत्रात तीन वर्षे सेवा दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची बदली सक्तीची करावी.
16. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, नगरपालिका, MIDC व वन विभाग यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व संगोपन करावे.
17. छत्रपती संभाजी महाराजांचे प्रस्तावित स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे.
18. बोरवेल असलेल्या सर्वांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करावे.
19. नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत किमान ५०० विद्यार्थ्यांची अभ्यासिका उभी करावी.
20. नगरपालिकेच्या माध्यमातून सेमी-इंग्लिश शाळा सुरू कराव्यात.
21. ITI च्या स्थापनेसाठी प्रस्ताव व ठराव त्वरित मंजूर करावेत.
22. संपूर्ण शहरासाठी आधुनिक सिव्हेज ट्रीटमेंट प्लॅंट (STP) उभारावा; रेल्वे, दीपनगर, ऑर्डनन्स फॅक्टरी, कंडारी-वरंगाव ग्रामपंचायतींनाही सक्ती करावी.
23. फ्रुट मार्केट, खाऊ गल्ली, नॉनव्हेज मार्केट यांसारखी नियोजित बाजारपेठा उभारून इतरत्रील अतिक्रमणे हटवावीत.
24. तापी नदी घाटाचा विकास करून उदयपूरच्या फतेहसागर लेकच्या धर्तीवर नवे पर्यटनस्थळ विकसित करावे.
स्वतंत्र भारत परिवाराने स्पष्ट केले आहे की, निवडून येणारे सर्व लोकप्रतिनिधी या २४ मागण्यांची पूर्तता करतील याची खात्री करून घेण्यासाठी परिवार पुढील पाच वर्षे सतत सक्रिय राहील आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनही छेडेल.अशी माहिती स्वतंत्र भारत परिवार, भुसावळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी रितेश जैन , मुन्ना ठाकूर, चंद्रशेखर पाटील, उमेश पाटील, कैलास चव्हाण, दिनेश दोधानी अशांचे उपस्थिती होती.




































