भुसावळ : शहरातील श्रीराम नगर परिसरातील दोन महिलांचे बस प्रवासादरम्यान ३५ तोळे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रावेर येथे लग्नासाठी जाण्यासाठी भुसावळ बस स्थानकावरून भुसावळ-रावेर बसने प्रवास करत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक सकाळपासून भुसावळमध्ये दाखल झाले असून खबऱ्यांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
तसेच, संशयितांच्या शोधार्थ एलसीबीचे पथक उत्तर प्रदेशकडे रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हा कधी नोंदवला जाणार आणि चोरी गेलेले सोने परत मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


























