भुसावळ – तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीनखान रमजानखान पठाण (वय ६६, रा. बी.टी.पी.एस. कॉलनी, दिपनगर) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार लकविंदरसिंग जसविंदसिंग सन्सोय ऊर्फ बब्बूसिंग (रा. त्रिमुर्ती हॉटेलजवळ, निंभोरा बु.),अक्षय पाटील (रा. निंभोरा बु.) व त्यांच्यासोबत एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता दिपनगर वसाहतीतील क्वार्टर क्रमांक न्यु ई-३९/१ येथे घडली. फिर्यादी व त्यांचे सहकारी उपस्थित असताना, ओव्हरलोड राख भरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. महेंद्र काशिनाथ पाटील (रा. फुलगाव) यांच्या बल्करमध्ये राख न भरण्याच्या मुद्द्यावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ४९, १३१, ३२९(४), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार योगेश पालवे करीत आहेत.




































