मुंबईत जोरदार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, पावसाचा रेल्वे, रस्ते आणि भुयारी मार्ग व मेट्रो वर परिणाम, हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला..

पोलीस वार्ता, ठाणे : यंदा महाराष्ट्रात वेळेआधीच 2025 मध्ये मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. कोकणासह आज पुणे, मुंबईत येऊन मान्सून चांगलाच बरसला आहे. या सुरुवातीच्या पावसातच मुंबई तुंबली आहे. अनेक भागात रस्त्यात पाणी साचलं असून वरळी मेट्रो भुयारी स्थानकात पाणी साचले आहे. मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गांवरील लोकल गाड्या उशिरा धावत आहे.

पुढील आजुन काही तास पावसाचा जोर चालू राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे. सोमवारी सकाळी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता पण मंगळवारी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टीचा इशारा देत हवामान खात्याकडून मुंबईकरांना काळजी घेण्याचं व आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
-
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..
राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रशासनाला दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन त्यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात गेल्या 12 तासात सुमारे 252mm पावसाची नोंद झाली असून कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने मुंबईत जागोजागी पाणी साचले. घाटकोपर, सायन, मीलन सबवे, अंधेरी सबवे, किंगसर्कल, हिंदमाता अशा सखल भागातील परिसरातील पाण्याचा निचरा झाला असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा 15 दिवस आधीच मान्सूनचे आगमन होऊन जास्त पाऊस पडला, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.







































