भुसावळ : शहरातील श्रीराम नगर परिसरातील दोन महिलांचे बस प्रवासादरम्यान ३५ तोळे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यासंदर्भात पोलिसांकडून तक्रारदारांना फिरवले जात असल्याचा आरोप पुढे आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रावेर येथे लग्नासाठी जाण्यासाठी भुसावळ बस स्थानकावरून भुसावळ-रावेर बसने प्रवास करत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
घटना लक्षात आल्यानंतर महिलांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मात्र, पुढील कारवाईसाठी तक्रारदारांना रावेर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार दोन्ही महिला व त्यांचा परिवार रावेर पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तेथे गुन्हा नोंदविण्याऐवजी त्यांना पुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आल्याचे समोर आले. यामुळे आधीच मोठे नुकसान झालेल्या तक्रारदारांना मदत करण्याऐवजी पोलिसांकडून फिरवा-फिरव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे भुसावळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आले असल्याची माहिती मिळताच तक्रारदारांनी तातडीने तेथे धाव घेतली. आता या चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का आणि तक्रारदारांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























