समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटरचा मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील दोन मोठ्या शहरांना जोडणारा वेगवान समृद्धी महामार्गाच्या 76 किलोमीटरच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण आज दि.5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या हस्ते इगतपुरी येथे करण्यात आले.

गुरुवारी समृद्धी महामार्ग अर्थात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमने आणि ठाणे असे शेवटच्या टप्प्याचं उद्धाटन झाल संपन्न झाले. आता मुंबई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा प्रवास केवळ 8 तासांत पूर्ण होणार आहे. असा दावा सरकारकडून केला जात असला, तरी समृद्धी महामार्गाच्या प्रवेशापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईकर, ठाणेकर किंवा कल्याणकरांना टप्प्याटप्प्यानेच प्रवास करावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटरचा मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरी जवळील बोगदा हा 8 किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. हा महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार असून राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 55 हजार 335 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. राज्यातील 24 जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा.उ) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ.निरंजन डावखरे, आ.नितीन पवार, आ.सरोज अहिरे, आ.हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारत अडथळे येऊ नयेत म्हणून 100 प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरण पूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहन चालवतांना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







































