म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून 17.2 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे लागोपाठ सात धक्के बसले..
पोलीस वार्ता, नवी दिल्ली : म्यानमारमधील स्थिती अत्यंत कठीण बनली आहे. देशातील गृहयुद्धाच्या संकटात सापडलेल्या म्यानमारवासीयांना भूकंपाच्या प्रलयकारक संकटाचा सामना करावा लागला आहे. शुक्रवारी आलेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे 700 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर 1670 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनानुसार 30 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत, ज्यामुळे आणखी मोठे मानवी संकट निर्माण झाले आहे. हे संकट म्यानमारसाठी एक अत्यंत गंभीर आव्हान ठरले आहे, ज्यामुळे या देशातील स्थिरता आणखी खालावली आहे.

म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून 17.2 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे लागोपाठ सात धक्के बसले, त्यापैकी 7.7 (रिष्टर स्केल) तीव्रतेचा सर्वात मोठा धक्का होता. भूकंपानंतर म्यानमार व थायलंडमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून ठिकठिकाणी बचाव मोहिमा चालू आहेत. दुभंगलेले रस्ते, उघडलेले महामार्ग, कोसळलेले पूल असे चित्र भूकंपग्रस्त भागांत दिसत आहे. म्यानमारमधील लष्करशाहीने भूकंपानंतर सहा प्रांतांत आणीबाणीची घोषणा केली आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती आणि त्याच्या पश्चात 6.4 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. म्यानमार आणि थायलंडने देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे, कारण या भूकंपाचा प्रचंड परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे त्या दोन्ही देशांमध्ये गोंधळ माजला आहे. म्यानमार आणि थायलंडने देशभरात आणीबाणी
म्यानमारच्या शेजारी असलेल्या चीनच्या युनान प्रांतातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले, पण तिथे सध्या कुठलीही मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र, युनान प्रांतात काही मालमत्तेचं नुकसान झाल्याची शक्यता आहे आणि या नुकसानाबद्दल तपास सुरू आहे. या भूकंपीय संकटामुळे संपूर्ण क्षेत्रात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड होती की म्यानमारच्या शेजारील देशांमध्ये, जसे की बांगलादेश, लाओस, चीन आणि भारतातही धक्के जाणवले. भारताच्या मणिपूर आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले, पण सुदैवाने भारतात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.










































