चिखली शिवारातील हॉटेल्स, धाब्यांवर गंभीर आरोप; नागरिकांकडून कारवाईची मागणी
प्रतिनिधी / धनराज मांडवकर
मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली शिवार परिसरातील काही हॉटेल्स व धाब्यांमध्ये जेवण व्यवसायाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिक व गावकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असूनही शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या व्यवसायाला काही राजकीय अथवा शासकीय हस्तक्षेपाचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या मते, अशा प्रकारच्या व्यवसायामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. गुप्त आजार तसेच एड्ससारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आरोग्यविषयक तपासण्या व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नियमानुसार अशा ठिकाणी कार्यरत महिलांची नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक परवाने तसेच संबंधित हॉटेल्स व धाब्यांकडे ग्रामपंचायतीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) असणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, येथे येणाऱ्या महिलांची ओळख, त्यांचे वास्तव्य, आरोग्यस्थिती याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच परिसरात मद्यविक्रीही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रात्रीच्या वेळी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक तरुण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याने जीवितास धोका निर्माण होत आहे.
“महामार्गालगत सुरू असलेला हा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून चौकशी व कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.




































