भुसावळ – तालुक्यातील खडका येथील तरुणाने प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून तरुणाला खांबाला बांधून निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना २० मार्च रोजी दुपारी घडली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण व तरुणी यांनी १८ मार्च रोजी घरातून पळून जाऊन नाशिक येथील पंचवटी येथे विवाह केला. त्यानंतर १९ मार्च रोजी दोघांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली होती. पोलिसांनी जबाब नोंदवून त्यांना घरी जाण्यास सांगितले.
मात्र २० मार्च रोजी दुपारी मुलीचे काका मनोज पाटील व मावशी रुपाली पाटील यांनी १० ते १५ जणांसह भुसावळातील सुहास हॉटेलजवळील दूध डेअरी परिसरात तरुणाला पकडले. त्याला खांबाला बांधून निर्वस्त्र करत लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली.यानंतर आरोपींनी तरुणाला मोटरसायकलवरून खडका येथे नेले.
बसस्थानकाजवळ उतरवून गळ्यात रुमाल टाकून ओढत नेत पुन्हा मारहाण केली.तसेच घरापर्यंत पायी नेत त्याला व त्याच्या आईलाही मारहाण करण्यात आली.घर जाळून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली.या मारहाणीमध्ये तरुणाचा एक हात फ्रॅक्चर झाला असून परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.या प्रकरणी चेतन दिलीप जंगले यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मनोज पाटील, रुपाली पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील तसेच इतर १० ते १२ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोमल प्रकाश पाटील (वय २४), विजय नरोटम पाटील (वय ५२), हेरंब महेश चौधरी (वय १९),ज्ञानेश्वर भास्कर भोई (वय १९) आणि संजय सोनू बडे (वय ६०) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश देशमुख करीत आहे.




































