माथेफिरू वकिलाचे कृत्य,सर्व स्तरावरून निषेध
दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने एका वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना ता.६ रोजी घडली.
न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ च्या सुमारास सुरू झाल्यावर या वकिलाने घोषणा देत थेट सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न केला,पण सहकारी वकिलांनी त्याला पकडून ठेवले.राकेश किशोर नावाचा हा वकील सनातनाच्या अपमान भारत सहन करणार नाही असे ओरडत होता.असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.दरम्यान,या घटनेचा विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून निषेध करण्यात आला असून ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ चे (बीआरआय) वकील राकेश किशोर याला निलंबित केले आहे.
संबंधित वकिलाकडून पायातून बूट काढला जात असताना सरन्यायाधीश गवई हे शांत होते.’अशा कृत्याचा आपल्यावर फरक पडत नाही तुम्ही तुमचे म्हणणे मांडा’ असे त्यांनी इतर वकिलांना सांगितले.या घटनेनंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली. मध्यप्रदेशातील खजुरहो येथील भगवान विष्णूच्या मूर्तीशी संबंधित खटल्यात सरन्यायाधीशांनी केलेल्या टिपणीचा या घटनेची संबंध जोडला जात आहे. सरन्यायाधीशांच्या या टिपणीवर विश्व हिंदू परिषद तसेच काही धर्मगुरूंनी टीका केली होती.
काय म्हणाले होते सरन्यायाधीश?
‘ मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले जावे, ‘अशी विनंती करणारी याचिका राकेश दलाल नावाच्या व्यक्तीने दाखल केली होती.याचिका निकाली काढताना सरन्यायाधीश गवई यांनी ‘तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात तर मग देवलाच काहीतरी करण्यासाठी सांगा,असे सुनावणीवेळी सांगितले होते.मूर्तीच्या डागडुगीचा विषय हा न्यायालयाचा नव्हे तर पुरातत्त्व खात्याच्या अधिकारात येतो.तुमची याचिका प्रसिद्धीसाठी असल्याचे दिसते.तुम्ही स्वतःला भगवान विष्णूचे कट्टर भक्त मानता तर मग प्रार्थना आणि थोडी ध्यानधारणा करा.
























