तीन तरुण, मावळ येथील किन्हाई गाव जवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या बोकडेवाडी बांधमधील जल उपसा केंद्र जवळ इंद्रायणी नदी पात्रात दि.15 मार्च ला पोहण्यासाठी गेले होते..

पोलीस वार्ता, पिंपरी-चिंचवड : पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात राहणारे आणि धुलीवंदन निमित्त इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड येथील घरकुल येथे वास्तव्यास असलेले तीन तरुण, मावळ येथील किन्हाई गाव जवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या बोकडेवाडी बांधमधील जल उपसा केंद्र जवळ इंद्रायणी नदी पात्रात दि.15 मार्च ला पोहण्यासाठी गेले होते. दु.4 वाजेच्या सुमारास हे तरुण पाण्यात गेले, त्यांमध्ये आकाश, रोहित आणि विशाल व आणखीन दोन मित्र हे सर्व इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेले होते. यातील तिघेजण पाण्यात उतरले. दोघेजण कडावरच होते. पोहता-पोहता तिघांना दम लागला आणि एकाएकी ते बुडू लागले, तोड्यावेळातच ते तिघे दिसेनासे झाले. कडेला असलेल्या दोघांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. परंतु उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस, ग्रामस्थ अग्निशमन दल आणि एन.डी.आर.एफ टीम व मावळ वन्यजीव रक्षक टीम हे घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम सुरू असताना दोन तासांच्या प्रयत्नाने त्यांचे मृतदेह सापडले.





































