सिडको ( रमाकांत मोरे ) एक बजाजनगर येथे स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांची सुपुत्री धनश्री दीदी तळवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यातील स्वाध्याय परिवार छत्रपती संभाजीनगर येथे रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करत आहे. शनिवारी (दि. ९ ऑगस्ट) रोजी सायंकाळी सिडको महानगर ( बजाजनगर ) येथील मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा होत आहे. भारतीय संस्कृतीने मानवविकासासाठी दिलेल्या विविध उत्सवांपैकी एक महत्त्वपूर्ण उत्सव म्हणजे रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) बहुविध पैलू असणारा हा एक पवित्र उत्सव आहे. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पवित्र बनवण्याचा, बहिणीच्या रक्षणाची भावाची जबाबदारी समजावणारा आणि भाऊ-बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा संदेश देणारा हा उत्सब म्हणजे आपल्या संस्कृतीचे एक सोनेरी पान आहे. परम पूजनीय दादांनी दैवी भ्रातृभावाच्या नात्याने एक वैश्विक स्वाध्याय परिवार निर्माण करून, बंधु-भगिनींच्या नात्याला विश्वव्यापक बनवून रक्षाबंधनाचा गौरव वाढवला आहे. तसेच संस्कृतिमातेच्या रक्षेचे बंधन स्वीकारणारी लाखों माणसे घडवून त्यांना संस्कृतीच्या कार्यासाठी निरपेक्षपणे काम करण्याची प्रेरणा दादांनी दिली आहे. आज रक्षाबंधन या भाऊ-बहिणीच्या निर्मळ उत्सवात काहीसा यांत्रिकपणा आणि रूक्षता आली आहे. राखीचे डिझाईन आणि बहिणीला द्यायचे ‘गिफ्ट’ औपचारिकतेतच रक्षाबंधन अडकले आहे. या नात्याची पवित्रता, निर्मळता आणि दिव्यत्व आपण काहीसे विसरत चाललोय, स्वाध्याय परिवाराला या संबंधाला एक दैवी परिमाण द्यायचा प्रयत्न करायचा आहे व केवळ भाऊ बहिणच नव्हे तर सर्वच संबंधांचे उदात्तीकरण, ऊर्धीकरण करायचे आहे. त्यासाठी स्वाध्याय परिवार अलौकिक पद्धतीने रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करत आहे.

वैश्विक स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (परम पूजनीय दादा) यांनी त्यांच्या अथक प्रयत्नांतून आणि भक्तीच्या माध्यमातून लक्षावधि लोकांच्या जीवनात दैवी क्रांती घडवली आहे. परम पूजनीय दादांच्या या वैश्विक स्वाध्याय कार्याची धुरा त्यांची सुपुत्री पूजनीय श्रीमती धनश्री तळवलकर (पूजनीय दीदी) अखिल स्वाध्याय परिवाराची मोठी बहीण बनून अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत.
स्वाध्याय कार्याचा देदीप्यमान वारसा विश्वाच्या कानाकोपऱ्याात पोहोचवण्यासाठी दीदी अविरत कार्यरत असून माणसामाणसांत दैवी भ्रातृभावाचा आत्मीय नेहबंध निर्माण करत आहेत. पवित्र रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या उत्सवांनिमित्त स्वाध्याय परिवाराला भेटण्यासाठी शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी पूजनीय दीदींचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन होत आहे.
रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असून यात जवळपास ५ हजार स्वाध्याय युवा आणि युवती एका नृत्य गीताद्वारे दीदींना मानवंदना देणार आहेत. पूजनीय दीदींचे मंगल प्रवचन या उत्सवाचा केंद्रबिंदू असणार आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील हजारों स्वाध्यायी उपस्थित राहाणार आहेत. विशेष म्हणजे दादांच्या स्वाध्यायाचा, हृदयस्थ भगवंताचा आणि दैवी भ्रातृभावाचा विचार अनेकानेक गावांत ‘भक्तीफेरी’ च्या माध्यमातून पोहोचवून हे स्वाध्यायी उत्सवासाठी एकत्रित येणार आहेत.रक्षाबंधनाचा पवित्र दिवस ‘नारळी पौर्णिमा’ म्हणूनही साजरा करण्यात येतो. विविध रत्नांची खाण असणारा, अब्जावधि जीवांना सांभाळणारा, संपूर्ण सृष्टीला अत्यावश्यक असं जल पुरवणारा समुद्र माणसाकडून कोणत्याही मोबदल्याची, अगदी धन्यवादाचीही अपेक्षा न करता, निरलसपणे आपले कार्य अविरतपणे करत असतो. त्या रत्नाकराचे पण स्वाध्याय परिवार या निमित्ताने कृतज्ञतापूर्वक पूजन करत असतो.
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असे दोन्ही उत्सव स्वाध्याय परिवार विश्वभरामध्ये साजरा करत आहे. यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथे पुजनीय धनश्री दीदींची उपस्थिती स्वाध्याय परिवाराचा आनंद द्विगुणित करणारी ठरणार आहे. कार्यक्रम स्थळ : सिडको एक महानगर मैदान, ऑर्किड स्कूल, पाण्याच्या टाकीजवळ ( बजाजनगर )दिनांक : शनिवार ९ ऑगस्ट २०२५ ला सायंकाळी पांच वाजता दिदींचे मंगल प्रवचन सुरु होइल




































