महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण
भुसावळ – शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात (गुड्स यार्ड) एका बंद खोलीत अज्ञात व्यक्तीचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचे शिर लटकलेल्या अवस्थेत आढळले, तर कुजलेले धड खाली जमिनीवर पडलेले होते. प्राथमिक अंदाजानुसार ही घटना सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी घडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घटना कशी उघडकीस आली?
दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३:३६ वाजता आर. के. पांडे (टीआय/मुख्यालय/भुसावळ) यांनी भुसावळ सीजीएस विजय रामटेक यांना जुन्या माल गोदामातील सामान घेण्यासाठी संपर्क साधला. त्यानुसार खासगी कामगार शेख इरफान याला गोदामाची चावी देऊन तेथे पाठविण्यात आले. सायंकाळी सुमारे ४ वाजता गोदामाचे मुख्य दार उघडताच तीव्र दुर्गंधी येऊ लागली. दुसरे दार उघडताच समोर लटकलेल्या अवस्थेत शिर आणि खाली पडलेले कुजलेले धड दिसताच सर्वजण हादरले. तत्काळ आरपीएफ, जीआरपी व बाजारपेठ पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली.
ओळख पटविणे कठीण
मृतदेहावरील काही कपडे शिल्लक असले तरी चेहरा व शरीर पूर्णपणे कुजल्याने ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे हा खून आहे का, आत्महत्या की अन्य कोणता घातपात, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह
घटना घडलेले कार्यालय बराच काळ बंद असून त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून भंगार ठेवले जात असल्याची माहिती आहे. अशा ठिकाणी अज्ञात व्यक्ती कशी पोहोचली? खोलीचे कुलूप तोडले गेले की चावीचा गैरवापर झाला? इतक्या दिवसांपासून मृतदेह सडत राहूनही यंत्रणेला याची खबर कशी लागली नाही? अशा अनेक गंभीर प्रश्नांनी या घटनेने डोके वर काढले आहे.
हद्दीवरून दोन तास चर्चा
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस व बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही घटना नेमकी कोणत्या हद्दीत येते यावर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. परिपत्रक तपासणी व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर हा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आणि पुढील तपास सुरू करण्यात आला.
अधिकाऱ्यांची धावपळ
घटनास्थळी रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक ओ. पी. मीना, जीआरपीचे निरीक्षक गोविंदा पांडव, उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे, नितीन पाटील, धनराज लुले, जय कोळी, सुधीर पाटील, बाबू मिर्जा यांच्यासह बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक मोहम्मद अली सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब पाटील, नितीन सपकाळे आदींनी धाव घेतली.
रेल्वे सुरक्षिततेच्या दाव्यांवर प्रश्न
भुसावळ हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असून येथे कवच प्रणाली, सीसीटीव्ही निरीक्षण, मॉक ड्रिल, डॉग स्क्वॉड आदी आधुनिक सुरक्षा उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र जुन्या मालगोदामात घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रशासन व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मृत व्यक्तीची ओळख पटविणे व मृत्यूचे नेमके कारण शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.



































