जळगाव : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या घरफोडीच्या घटनांना आळा घालत पोलिसांनी मोठी कारवाई करत १० गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पाच अट्टल आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बंद घरे हेरून रात्रीच्या अंधारात घरफोडी करणाऱ्या टोळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव तालुका पोलिसांना गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.

गुन्हा क्रमांक ६७/२०२६ च्या तपासादरम्यान गुप्त माहितीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (टोळीचा म्होरक्या), दीपक बापू पाटील, राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी आणि महेश उर्फ संतोष भोई या पाच आरोपींना अटक केली.
कसून चौकशीत आरोपींनी ९ घरफोडी आणि १ मोटारसायकल चोरी असे एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून घरफोडीतील २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज तसेच २ लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तपासात मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ११, जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात १ आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात १ असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू केले होते. मात्र, जळगाव तालुका पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पीएसआय यज्ञजीता येडले तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.



































