सातारा | प्रतिनिधी महेश गोंदकर । सातारा येथे संत समर्थ श्री रामदासस्वामी यांच्या बदनामीप्रकरणी संताप व्यक्त करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ व कठोर कारवाईची ठाम मागणी केली आहे. तसेच देव, देश, धर्म, संत व राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्याचीही जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, समर्थ रामदासस्वामी यांनी समाजजागृती, धर्मप्रसार आणि राष्ट्रभक्ती रुजविण्यात ऐतिहासिक कार्य केले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेलाही त्यांची प्रेरणा लाभली होती. असे असताना काही समाजविघातक घटकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी व अपमानास्पद विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेषतः समाजमाध्यमांचा आधार घेत कोणतेही ठोस ऐतिहासिक पुरावे न देता संतांच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप केले जात असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. अशा प्रकारांमुळे तरुण पिढीची दिशाभूल होत असून समाजात असंतोष वाढत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायदा त्वरित करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. संत व राष्ट्रपुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनतेत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ह्या वेळेस श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचे श्री. योगेशबुवा रामदासी, श्री. शहाजीबुवा रामदासी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा तालुका प्रमुख श्री. शिवराज तलवार, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजय गाढवे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सातारा जिल्हा कार्यवाहक श्री. महेश शिवदे, श्री. नरेंद्र महाराज नाणीजधाम संप्रदायाचे श्री. राजेंद्र जाधव, श्री बहुलेश्वर देव ट्रस्ट चे विश्वस्त श्री. अमोल गोसावी, अधिवक्ता श्री.अक्षय पुजारी, श्री. मल्हार दिवाकर, श्री. संजय शिंदे, इस्कॉनचे श्री. परेश पाटील, श्री. प्रसाद माने, श्री. प्रवीण रसाळ, सातारा तालुक्यातील धारकरी, समर्थ भक्त, हिंदुत्वनिष्ठ व गोरक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.




































