भुसावळ – शहरातील आगाखान वाडा परिसरातील कत्तलखान्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ९ मे २०२६) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ता. ९ रोजी सकाळी ०८.०० ते ०९.३० वाजेच्या सुमारास मुस्ताक खान रहीम खान व सैय्यद असरद गफार (दोन्ही रा. आगाखान वाडा, भुसावळ) तसेच त्यांचे अन्य दोन ते तीन साथीदार यांनी सदर ठिकाणी गोवंश जातीच्या पशूंची कत्तल केल्याचे समोर आले. घटनेनंतर काही संशयित घटनास्थळावरून पळून गेले.
कारवाईदरम्यान, कत्तल केलेल्या पशूंचे मांस हातगाडीवर आढळून आले असून त्याची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच कत्तलखान्यालगत असलेल्या खोलीत सुमारे ९ जिवंत गोवंश जातीचे पशू कोंडून ठेवलेले आढळून आले, ज्यांची एकूण किंमत अंदाजे १ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पशु संवर्धन (संरक्षण) सुधारणा कायदा १९९५ चे कलम ५ (अ), ५ (क), ९ तसेच प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ (१)(इ) आणि भा.न्या. संहिता कलम ३२५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


























