भुसावळ (निलेश फिरके)। शहरातील टेक्स्टाईल उद्योगांना मोठी चालना देऊन स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाहाटा कॉलेजजवळ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या मागणीवर हा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार राजू मामा भोळे, आमदार अमोल जावळे, आ.मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तसेच भुसावळच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रांतील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सत्ता एकहाती दिल्यासच विकासाचा मार्ग सुकर होतो, असे सांगत महिलांना प्राधान्य देण्याच्या भाजपच्या धोरणाचा उल्लेख केला. अनेक नगरपालिकांमध्ये महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय याच हेतूने घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांनी ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याचे सांगत प्रचारात पूर्ण क्षमतेने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, ज्या ठिकाणी युती आहे तिथे युतीसाठी आणि जिथे नाही तिथे भाजपसाठी काम करा. नगरपालिका क्षेत्रात महिलांचे प्रश्न अधिक असल्यानेच महिलांना उमेदवारी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील विकासकामांवर आश्वासनांची मालिका
सावकारे यांनी सांगितले की, भुसावळचा पाणी प्रश्न १८ महिन्यांत मार्गी लागेल आणि प्रत्येक घरात २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध होईल. अमृत योजनेचे काम वेगाने सुरू असून बस स्टँड जागेचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल. शहरातील ७० टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शहर हद्दवाढ प्रस्तावही विचाराधीन असून मंजुरीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुंडगिरी आटोक्यात — गिरीश महाजन
कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळातील गुंडगिरी पूर्णपणे आटोक्यात आल्याचा दावा केला. विरोधकांवर टीका करताना, “रोहित पवार हे बाबांच्या खांद्यावर मोठे झाले; पोस्टल बॅलेटवरून निवडून आले,” असा आरोप त्यांनी केला. यासोबतच “जिल्ह्यात एक तरी नगराध्यक्ष जिंकून दाखवा,” असे आव्हान देत जिल्ह्यातील सर्वच जागांवर भाजप विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चुनावी रंगत वाढवणारी आश्वासने
मुख्यमंत्री फडणवीस यांनी टेक्स्टाईल उद्योगांना चालना, रोजगारनिर्मिती, पिण्याच्या पाण्याचा स्थायी तोडगा, रस्ते विकास, बस स्टँड, हद्दवाढ यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर जलद तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आगामी निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चौधरी व धनंजय चौधरी यांनी केले. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सभेला अंदाजे १५ ते २० हजार नागरिकांची उपस्थिती होती.


































