यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील हिंगोणा गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात होऊन १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) घडली. या घटनेत एका तरुणीसह तिघेजण गंभीर जखमी झाले असून मुख्य संशयित आरोपी फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणा (ता. यावल) येथील आरोग्य केंद्राजवळ संशयित गौरव जाधव याचा प्रथमेश मुकेश महाले (वय १९, रा. हिंगोणा) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्याने गौरव जाधव याने प्रथमेशवर चाकूने सपासप वार केले. यात प्रथमेश गंभीर जखमी झाला.
दरम्यान, रीना मोहित गजरे (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०) व निखिल राजेंद्र गजरे (वय २६) यांच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला करून जखमी केले. जखमींना तातडीने सावदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती प्रथमेश महाले यास मृत घोषित केले. इतर तिघांवर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर फरार झालेल्या संशयित आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या हल्ल्यात एकापेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.


































