लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित..

पोलीस वार्ता, भोर | तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील विजेच्या मेन लाईन तुटून खाली पडल्या त्यावेळी गाभण असलेली गाय या तारींच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. 31 जुलै रोजी घडली आहे. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांत या परिसरातील ही दुसरी घटना असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरण कंपनीबद्दल रोष व्यक्त होत आहे.

याबद्दल मिळालेली माहिती अशी की, परिसरातील शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची ही मृत्यू झालेली गाय होती व ती गाभण असल्याचे कळले. याआधी दि. 29 जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर देखील विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. या लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर विचार करायला लावला आहे. गुरे रानात चारण्यासाठी नेण्यात पण आता शेतकरी व जनावर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.





































