मंत्री भुजबळ यांनी रविवार, 28 सप्टेंबर रोजी येवला मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागाची शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून अनेक नद्यांना पूर आला आहे. पुर ठिकाणाच्या व नदीकाठच्या लोकांना एनडीआरएफ कडून सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात काम सुरू आहे. नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या सोबत असून आवश्यक त्या उपायोजना करण्यात येईल असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
मंत्री भुजबळ यांनी रविवार, 28 सप्टेंबर रोजी येवला मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागाची शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या नैसर्गिक आपत्तीत पोलीस, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन (NDRF) विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून लोकांना मदत कार्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
आपत्तीग्रस्त कुटुंबांना 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ, ज्यांना गहू नको असतील त्यांना तेवढेच तांदूळ वाटप करण्याचे, तसेच प्रति कुटुंब 3 किलो डाळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. गरजू आपत्तीग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवून निवारा उपलब्ध करून देण्याच्या देखील सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ही परिस्थिती अतिशय गांभीर्यपूर्वक हाताळून लोकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य देत आहे. तसेच गरजूंना मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील अंदरसुल येथे पाण्यात उतरून पाहणी केली. कोळगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरातील हुडको कॉलनी घरांची, त्यानंतर सावरगाव परिसर पाहणी करत पाटोदा शहरातील शॉपिंग सेंटर, निफाड तालुक्यातील पाचोरा, मरळगोई, लासलगाव, टाकळी विंचूर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.







































