सातारा : पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली (भारत) या संघटनेच्या सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार होमगार्ड तसेच पोलीस भरतीत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती पत्रकार मीनाक्षी पोळ यांनी दिली.
संघटनेची स्थापना ११ मार्च २०११ रोजी दिल्ली येथे झाली असून, गेल्या १५ ते १६ वर्षांपासून संघटना देशहितासाठी विविध सामाजिक कार्य करत आहे. गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी संघटनेत सक्रिय आहेत.
हे कार्यकर्ते वेळोवेळी पोलीस प्रशासनासोबत काम करत असून, ग्रामीण भागात शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्याचे कामही संघटनेच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व गुणवत्तेनुसार पोलीस भरती प्रक्रियेत त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी, राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख गजानन भगत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील, व्यापार विभाग अध्यक्ष अॅड. पुष्कर चौधरी तसेच प्रकाश चौधरी यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच गृहसचिव, महाराष्ट्र राज्य यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
सातारा जिल्हा अध्यक्ष मीनाक्षी (ताई) बबनराव पोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली.


























