भुसावळ : येथील नगरपरिषदेत विकासकामांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून भाजप गटाच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटावर गंभीर आरोप केले.
पत्रकार परिषदेत बोलताना नारखेडे यांनी सांगितले की, आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांना नगराध्यक्षा गायत्री भांगळे यांच्याकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाची कामे रखडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भुसावळ शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास आमदार सावकारे यांच्या माध्यमातून झाला असून सध्या सुरू असलेल्या कामांनाही अडथळे आणले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आर्थिक फायदा होत नसल्याने काही कामे थांबवली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, या आरोपांमुळे भुसावळ नगरपरिषदेतील राजकारण अधिकच चिघळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




































