भुसावळ – येथील तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भुसावळ व परिसरातील हजारो रेशनकार्ड धारकांच्या कार्डांवर चुकीने नाशिक जिल्ह्याचा पत्ता नोंदवण्यात आल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शहरात वास्तव्यास असूनही कार्डांवर नाशिकचा पत्ता दिसत असल्याने ना येथे रेशन मिळते, ना नाशिकमध्ये दुरुस्ती होते, अशी हास्यास्पद पण वेदनादायक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या चुकीमुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे गेली पाच वर्षे शासनाच्या रेशनसुविधांपासून वंचित आहेत.
नागरिकांनी तहसील आणि पुरवठा कार्यालयाचे अक्षरशः अनेक फेरे मारले, मात्र अधिकाऱ्यांकडून केवळ टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुमच्या कार्डावर नाशिकचा पत्ता आहे, त्यामुळे दुरुस्ती तिथेच होईल,” असे सांगून नागरिकांना परतवून लावले जाते, अशी माहिती पीडितांनी दिली.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेले अधिकारी निष्काळजी आणि असंवेदनशील आहेत. “तक्रारी करून थकलो, पण कोणी दखल घेत नाही. अधिकारी फक्त फाईल पुढे ढकलतात, पण प्रश्न सुटत नाही. आम्ही कोणाकडे जावे?” असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
शासनाकडून ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना देशभर राबवली जात असताना, अशा तांत्रिक आणि प्रशासकीय चुकांमुळे ही योजना भुसावळात कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक “शासन आपल्या दारी” आणि “सेवा पंधरवडा” कार्यक्रम झाले, तरी कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच सर्व चुकीची रेशनकार्डे तातडीने दुरुस्त करून भुसावळसह परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


































