भुसावळ – राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (एडीजीपी) नवल बजाज यांनी आज भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे तीन तास सखोल तपासणी केली. त्यांच्या सोबत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधून भुसावळ ठाण्याची निवड तपासणीसाठी करण्यात आली होती. एडीजीपी बजाज यांनी रेकॉर्ड, गुन्हे, चौकश्या आणि कामकाजाचा सखोल आढावा घेतला. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनाही तपासणी दरम्यान महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.
तपासणी दरम्यान एक विनोदी प्रसंगही घडला—वरिष्ठ अधिकाऱ्यांना शौचालयास जाण्याची वेळ आली असता कुलुपाची चाबी उपलब्ध नव्हती आणि शेवटी पोलीस कर्मचाऱ्यांना कुलुप तोडावे लागले. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, चाबी पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयात होती, परंतु एडीजीपीच्या उपस्थितीत ती मिळू शकली नाही.
एडीजीपी बजाज यांनी पत्रकारांशी संवादात म्हटले की, “जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे, परंतु पोलिसांची संख्या त्यानुसार वाढलेली नाही. भरतीसाठी सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.”
तपासणी दरम्यान पत्रकारांना बाहेर राहण्यास सांगण्यात आले, ज्यामुळे थोडा वाद निर्माण झाला.
तपासणी दरम्यान हर्षल सावकारे आणि मयुर सावकारे या दोन्ही बंधूंनी एडीजीपींच्या उपस्थितीत थेट पोलिस प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स” परिसरातील सट्टा-मटका आणि जुगारधंद्यांविरोधात तक्रार केली. सावकारे बंधूंनी म्हटले की, “बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे सुरू आहेत आणि त्यातून लाखो रुपये कमावले जात आहेत. पोलिस आणि नगरपालिकेच्या संगनमताने हे व्यवसाय सुरू आहेत.”
सावकारे बंधूंच्या आंदोलनानंतर सट्टा-मटका दुकानदारांनी घाईघाईने दुकाने बंद करून पळ काढला. या घटनेमुळे पोलिस प्रशासन आणि नगरपरिषदेची प्रतिमा धोक्यात आली असून आता या प्रकरणात पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




































