(युवराज लोणारी यांचे संतोष चौधरींना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आव्हान)
भुसावळ : (निलेश.के.फिरके) येथील नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत कायद्याच्या आधारेच उपनगराध्यक्षा शैलेजा नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारल्याचा दावा केला आहे.
सोमवार (ता.११) रोजी शैलेजा नारखेडे यांनी पालिकेच्या कामकाजाची सुरुवात केली. त्यानंतर शहरात विविध अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप लोणारी यांनी पत्रकार परिषदेत केला. “माजी आमदार संतोष चौधरी यांनी जणू काही आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्याप्रमाणे घोषणा दिल्या. शैलेजा नारखेडे यांना अधिकार नाही, त्या बेकायदेशीररीत्या बसल्या आहेत, अशा बतावण्या करण्यात आल्या. मात्र त्यांचे कायद्याचे ज्ञान कच्चे असून, सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीनेच झालेली आहे,” असे लोणारी म्हणाले.
शैलेजा नारखेडे यांच्या प्रभारी नगराध्यक्षपदाबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून समाधान करून घ्यावे, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले. “जर गायत्री भंगाळेच नगराध्यक्षा असत्या, तर त्यांचे अधिकृत वाहन काढून घेतले गेले नसते आणि १ मे “महाराष्ट्र दिन”रोजी ध्वजारोहणाचा मानही काढून घेतला नसता,” असा टोला त्यांनी लगावला.
लोणारी यांनी सांगितले की, जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर शासनाने परिपत्रक काढून गायत्री भंगाळे यांना अपात्र घोषित केले आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली असली, तरी न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. “स्थगिती मिळाल्याची अफवा पसरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
नगराध्यक्षा पदावरून गायत्री भंगाळे अपात्र झाल्यानंतर संबंधित पदभार आपोआप उपनगराध्यक्षांकडे आल्याचेही युवराज लोणारी यांनी स्पष्ट केले.




































