लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे..

पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज त्यांच्या जयंतीदिनी दि.1 ऑगस्ट रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि संघर्षाच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांना आवाज दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे येवला येथील अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक हे सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाचे प्रतीक ठरणार असून, सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्य करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे. “ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा विचार आजही समाजाला दिशा देणारा आहे. तसेच “जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव” या ओळींतून त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रभावी प्रचार केला, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगताना मंत्री भुजबळ यांनी त्यांच्या शाहिरी, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांमधून मराठी अस्मिता जागृत करण्याचे कार्य झाल्याचे नमूद केले. “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतिया काहिली” या गीतातून तत्कालीन महाराष्ट्राच्या भावविश्वाचे प्रभावी चित्रण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 35 हून अधिक कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लावण्या, शाहिरी, लोकनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीचा रशियन भाषेत झालेला अनुवाद हा मराठी साहित्याच्या जागतिक दर्जाचा सन्मान असून, त्यांच्या साहित्याने समाजपरिवर्तनाची प्रेरणा दिली आहे, असेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.




































