कोणत्याही धर्म, समाज किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेष पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रवृत्तीला थारा देणे म्हणजे समाजात जातीय तेढ निर्माण करणे..

पोलीस वार्ता, जळगाव : जिल्ह्यात रामनवमी निमित्त दि.26 मार्च 2026 रोजी रावेर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात तसेच फैजपूरच्या खंडेराव वाडी येथे झालेल्या कार्यक्रमांच्या वेळी काही लोकांनी समाजात द्वेष निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. या भाषणात इतर समाजात द्वेष, भीती व तणाव निर्माण करणारे वक्तव्य असल्याने याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 196, 299, 353 तसेच 152, 179, 270, 202, 352 आणि आयटी ॲक्ट 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी काही संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर प्रकरण घडून 8 ते 10 दिवस उलटून देखील अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने पोलीसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या In Re: Hate Speech (2023) प्रकरणानुसार, हेट स्पीच आढळल्यास पोलिसांनी कोणतीही तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून (suo motu) FIR नोंदवणे बंधनकारक आहे.
कोणत्याही धर्म, समाज किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेष पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रवृत्तीला थारा देणे म्हणजे समाजात जातीयतेचे ठिणगी लावण्यासारखे आहे. असे जळगाव एकता संघटनाचे फारुक शेख व कुर्बान शेख, कौमी एकता संघटना, फैजपूर यांचे म्हणणे आहे. जर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही, तर जिल्हाभरात लोकशाही मार्गाने संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच पोलिसांविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी संघटनांना वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन व संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या आश्वासन दिले आहे.






































