भुसावळ : महाड सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे महाराष्ट्रात ‘समता क्रांती यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.ही यात्रा १४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान राज्यभर काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भुसावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाड सत्याग्रहाने सामाजिक समतेच्या लढ्याला नवी दिशा दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पार्टी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन काम करीत आहे.सामाजिक समता,बंधुता आणि न्यायाचा संदेश यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
दरम्यान,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा पाठिंबा असल्याचेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून पक्ष विविध समाजघटकांच्या प्रश्नांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब भांबाळकर,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



































