उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती
भुसावळ – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेल्या महेंद्र बारेला याच्या शिक्षेबाबत बुधवारी विशेष जलद न्यायालयात अंतिम युक्तिवाद पार पडला. विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी हा गुन्हा “रेअरेस्ट ऑफ रेअर” प्रकारातील असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. न्यायालयाचा अंतिम निकाल गुरुवारी (४ जून) जाहीर होणार आहे.
दुपारी बारा वाजता विशेष न्यायाधीश एस. आर. यादव न्यायालयात स्थानापन्न झाल्यानंतर आरोपीला हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोष सिद्ध झाल्याची माहिती देत जन्मठेप अथवा फाशी अशा शिक्षेच्या पर्यायांची कल्पना दिली. यावेळी आरोपीने आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असून आपण एकमेव कमावता असल्याचे सांगत किमान शिक्षा देण्याची विनंती केली. तसेच भविष्यात अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाहीही दिली.
आरोपीतर्फे अॅड. सत्यनारायण पाल यांनी युक्तिवाद करत गुन्हा पूर्वनियोजित नसून अचानक घडल्याचा दावा केला. आरोपीचे वय व कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याला कमी शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी तब्बल ४५ मिनिटे प्रभावी युक्तिवाद करत आरोपीच्या कृत्याची क्रूरता अधोरेखित केली. चार निष्पाप बालकांची निर्दयी हत्या, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विश्वासघात आणि समाजमनाला हादरा देणारे स्वरूप या बाबींचा उल्लेख करत त्यांनी कठोरात कठोर शिक्षा देण्याची गरज मांडली.
ॲड. निकम यांनी हा गुन्हा समाजासाठी धोकादायक प्रवृत्तीचे उदाहरण असल्याचे सांगत, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी फाशीची शिक्षा आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ तत्त्वाचा दाखला देत समाजाच्या सामूहिक विवेकाला धक्का बसणाऱ्या गुन्ह्यांत कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या खटल्यात २८ साक्षीदार तपासण्यात आले असून प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात आला आहे.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना अॅड. प्रवीण भोंबे व अॅड. संभाजी जाधव यांनी सहाय्य केले, तर आरोपीतर्फे अॅड. सत्यनारायण पाल यांनी बाजू मांडली. न्यायालयात फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, डॉ . विशाल जयस्वाल यांची उपस्थिती होती.
चार निष्पाप भावंडांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला फाशी की जन्मठेप, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
______
चौकट…
युक्तिवादा दरम्यान निकम यांनी प्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या “हॅम्लेट” नाटकातील पात्रांचा संदर्भ देत आरोपीचे कृत्य अत्यंत दुष्ट आणि अमानवी असल्याचे प्रतिपादन केले. अशा व्यक्तीला दया दाखविणे चूक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
कारागृहातील समुपदेशन, सुधारणा कार्यक्रम आणि वर्तन अहवालांचा उल्लेख करताना निकम म्हणाले की, आरोपीमध्ये पश्चात्तापाची भावना दिसून आलेली नाही. त्यासाठी त्यांनी संस्कृतमधील “मन्त्रेण शाम्यते सर्पः, न खलः शाम्यते कदा” या उक्तीचा दाखला देत, “गारुडी पुंगी वाजवून सापाला शांत करू शकतो; मात्र काही दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये सुधारणा होणे कठीण असते,” असे प्रतिपादन केले.
____






























