भुसावळ- विधानसभा निवडणूकीसाठी ज्या ज्या मतदार संघात प्रचारासाठी जात आहे, त्या त्या ठिकाणी महिलांचे उल्लेखनीय प्रमाण आहे. महिला आपली घरातील सर्व काम करून प्रचारात सहभागी होत आहे. नक्कीच लाडक्या बहिणींचा परिणाम झाला, पण तो त्यांच्यासाठी नाही तर आमच्यासाठी झाला.बहिणींना सुद्धा कळून चुकलं आहे की भाजप पक्ष हा पैसे देवून आमिष दाखवत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अमिष दाखवणारे सरकार म्हणजे भाजपा सरकार असल्याचेही कॉग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या .
येथील भुसावळ विधानसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांच्या प्रचारार्थ आज १० रविवार रोजी दुपारी तीन वाजता नेहरू मैदानावर जाहीर सभा झाली.यावेळी खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांनी गेल्या पंधरा वर्षा मध्ये कोणतेही विकास कामे न केल्याने जनता नाराज आहे.जनतेला सुवर्ण संधी मिळाली आहे त्यांनी या निष्क्रिय सरकारला त्यांची जागा दाखवावी व काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भुसावळकरांना केले आहे.
पुरोगामी सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन उमेदवारांना (काँग्रेस) विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवून जिल्ह्याला परिवर्तनाची संधी दिली आहे.भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना आमिष दाखवत आहे,मात्र खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीचा फायदा आम्हाला होत आहे. त्यांनी पंधराशे रुपये देऊन योजना सुरू केली या योजनेचा लाभ महिलांना आम्ही तीन हजार रुपये दरमहा देणार आहे.बहिणीचे प्रेम आमच्याकडे नक्कीच जास्त आहे.यामुळे परिवर्तन नक्की होणार असल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला .
या सरकारच्या कार्यकाळात महिला सुरक्षित नाही,बदलापूर येथील शाळेचे संस्थापक खुद्द भाजपाचे पदाधिकारी होते त्यांनी या शाळेत चार वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाला दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केला तसेच पोलिसांवर राजकीय दबाव आणला यामुळे तक्रार देण्यासाठी पिडीतेच्या आई-वडिलांना 24 तास पोलीस ठाण्यात बसावे लागले . महिला असुरक्षित आहेत,महिलांना आर्थिक नाही तर मानसिक दृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. त्यांना स्वाभिमान,सुरक्षा व प्रतिष्ठा पाहिजे आहे.लाडकी बहिण योजनेत दिले जाणारे पैसे संजय गांधी निराधार योजनेचे हप्ते बंद करून देण्यात येत असल्याचा आरोपही खा.प्रणिती शिंदे यांनी केला. भाजपाने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवमान केला आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा सोडला नाही असेही त्या म्हणाल्या,राज्यात सर्वत्र रस्ते, वीज, पाणी,शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या असून महागाईने उसळी मारली आहे. शेतकऱ्यांच्या खताचे पोत्यांवर अठरा टक्के म्हणजे अठरा हजार जीएसटी घेण्यात येतो व शेतकऱ्यांना त्यांचेच पैसे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तीन महिन्यानंतर 2000 दिले जातात.
निवडणूक आली की साम-दाम-दंड-भेद वापरले जातात तसेच नाहीच काही तर इडीचा धाक आहेच.या सरकारला त्यांची जागा दाखवा ही तत्त्वांची लढाई जिंकायची आहे.भुसावळ मध्ये नक्कीच परिवर्तन घडेल “फुल नही हम चिंगारी है,हम भारत की नारी है ” या तत्त्वानुसार पेटून उठा व काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांचा भरघोस मतांनी विजयी करा असे जनतेला आवाहन केले.
राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही ; भुसावळ हे गुन्हेगारांचं केंद्र – एकनाथ खडसे
यावेळी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की सर्वात जास्त कट्टे भुसावळात मिळून आले आहे.ठीक आहे पोलिसांची चांगली कामगिरी आहे.मात्र भुसावळ हे गुन्हेगारांचं केंद्र बनत चालल्याचे सांगत गुंड घरापर्यंत पोहोचले पोलिसांचा धाक नाही, या राज्यातही कायद्याचा धाक राहिला नाही , महिला असुरक्षित आहे.बनावट नोटा, गावठी कट्टे,अंमली पदार्थ शहरात कुठून येतात याचा तपास पोलिसांनी करावा
विनोद सोनवणे हे आठ दिवसांपूर्वी आमदारांच्या प्रचार रॅलीत दिसून आले होते व तीन दिवसानंतर त्यांच्यावर गोळीबार झाला सुदैवाने ते बचावले.भुसावळ गुन्हेगारांचे केंद्र झाले असल्याचेही ते म्हणाले.तसेच महायुती सरकार हे फोडाफोडीचे राजकारण करणारे सरकार असल्याची टीका करत पन्नास खोके सर्व एकदम ओके असे म्हणत १५ वर्षात भाजपा सरकारने काय केले एकाच रात्रीतून ४० आमदार फोडून ५० खोके आणून लाडकी बहीणीला खुश करण्याचा खटाटोप सुरू केला आहे.
भुसावळ तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात कोणते विकासात्मक कामे झाली असा प्रश्न उपस्थित करून नाथाभाऊ यांनी स्थानिक आमदार यांनी कोणताही ठोस विकास केला नसून केवळ स्वतःचाच विकास केल्याचे सांगितले.शहरात रस्ते ,वीज ,पाणी असे मूलभूत हक्क सुद्धा नागरिकांना नाही,अमृत योजना बारगळली असून गेले आठ वर्षांपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे.१५ वर्षात काय केले आता हे सरकार लोकशाहीचे सरकार नाही तर लोकशाहीलाच मारून तयार झालेले सरकार असल्याची टीका केली.
भुसावळ शहराला परिवर्तनाची गरज – डॉ मानवतकर….
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांनी शहरात गेल्या 50 वर्षात विकास न झाल्याने भुसावळकर अतिशय कष्ट सोसत आहे आरोग्य सुविधा ठप्प असून तालुक्याचा विकास खुंटला आहे शहरातील गेल्या पंधरा वर्षात सत्ता गाजवणारे आमदार हे निष्क्रिय ठरले आहे असा आरोप करीत अशा अकार्यक्षम आमदारांना भुसावळकरांनी जागा दाखवावी व या निवडणुकीत महाविकास आघाडीला सेवेची संधी द्यावी असेआवाहन जनतेला केले.


























