संभाजीनगर महानगर एक सिडको येथे देवच आपले रक्षण करू शकतो आणि तोच जीवनाचा खरा आधार आहे, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख पूजनीय धनश्री दीदी यांनी केले. परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय परिवारातर्फे शनिवारी 9 ऑगस्ट रोजी सिडको महानगर वाळूज येथील रक्षाबंधन उत्सवात केले. यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हातील स्वाध्याय परिवार हजारोंच्या उपस्थित होता.
यावेळी उपस्थित परिवाराला मार्गदर्शन करताना दीदी म्हणाल्या की, केवळ शरीराराचे नव्हे तर मनाचे आणि बुद्धीचे रक्षण होणे देखील आवश्यक आहे. जो समर्थ आहे तोच आपले रक्षण करू शकतो आणि असा समर्थ फक्त देवच आहे. रक्षाबंधन उत्सवा बद्दल पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, समाजात आज माणासाचे माणसाशी नाते जोडले जाणे आवश्यक आहे. व्यक्ती कोणत्याही जातीचा, धर्माचा असेल तरीही त्याच्यात देव आहे, ही समज निर्माण झाल्यास समाजातील संबंध दृढ होतील असे त्यांनी स्पष्ट केले.
पूजनीय धनश्री दीदी यांचे मैदानावर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले सोबतच शंखनाद करण्यात आला. दीदींनी सर्व मैदानावर एका वाहनातून सर्व परिवाराला भेटल्या. व्यासपीठावर आल्यावर भगवंत आणि दादाच्या प्रतिमेचे पूजन केले. उत्सवात सुरुवातीला स्वाध्याय युवक आणि युवतींनी एका स्वाध्याय भावगीतावर नृत्य वंदना सादर केली. हे नृत्य वंदना सादर करताना राखीचा आकार साकारण्यात आला होता. विशेष म्हणजे या नृत्य गीताची तयारी दिवसभर असलेल्या पावसात केली. मैदानावर चिखल होता तरीही तयारी करून उत्स्फूर्तपणे कुठलीही तक्रार न करता सादरीकरण केले.

उत्सवासाठी खास व्यासपीठ साकारण्यात आले होते. या व्यासपीठाच्या बॅकग्राऊंडवर आकाश आणि त्यावर सूर्यरूपी आकारातील राखी सर्वांसाठी प्रेरणा रूप होती.व्यासपीठाच्या. समोर देखील जुन्या साड्यांचा वापर करून एक मोठ्या आकारातील राखी बनवली होती. सर्व मैदान टाकाऊ वस्तुतून शोभिवंत वस्तू बनवून सजवण्यात आले होते. पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून पाच सुंदर असे प्रवेशद्वार उभारण्यात आले होते.
स्वाध्याय कृतिशील ठिकठिकाणी उभा राहून वाहन नियमन आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळत होते. कोठेही वाहतुकीला अडथळा होऊ नये याची काळजी घेतली जात होती. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असा उत्सव साजरा होत असल्याने या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून स्वाध्याय परिवारातील कोळी बांधव आपल्या पारंपारिक वेशात आले होते आणि त्यांनी देखील नृत्यगीतावर ठेका धरला.
मैदानावर गुरुवारी धो धो पाऊस पडला होता. यामुळे मैदान चिखलमय बनले होते. तरीही ठिकठिकाणी मुरूम माती टाकून चिखलमय खड्डे बुजवले होते. उत्सवाच्या दिवशी पावसाने सकाळपासूनच मैदानावर हजेरी लावली. यामुळे मैदान पुन्हा एकदा चिखलमय बनले होते. पाऊस आणि चिखलाची तमा न बाळगता आलेल्या स्वाध्याय परिवार मिळेल त्या जागेवर बसून उत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र मैदानावर होते.



































