४० अंश तापमानात कथा; पार्किंग शहरातच – मूलभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह
यावल तालुक्यातील आकलुद येथे १० ते १६ मार्च दरम्यान शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी लाखो भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे स्थानिक नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या परिसरात तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले असून ग्रामीण भागात कथा आयोजित करण्यात आली असली तरी भाविकांच्या वाहनांसाठी शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाढत्या गर्दीमुळे अपघातांची शक्यता देखील नाकारता येत नाही.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांकडून पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था होणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असून कथा आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाल्यास स्थानिक नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
म्हणूनच लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने प्रशासन व आयोजकांनी ठोस नियोजन करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




































