दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, आरोग्य, सरकारी सेवा, आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून सन्मान मिळणे गरजेचे आहे.
नाशिक पोलीस वार्ता :- येवला शहरातील राधाकृष्ण लॉन्स येथे एलिम्को मार्फत आयोजित अस्थिव्यंग प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसविणे, कॅलिपर्स व तत्काळ नि:शुल्क वितरण शिबिरात मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, दिव्यांग व्यक्तीना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी एलिम्को मार्फत आयोजित हा उपक्रम प्रशंसनीय असून संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारा आहे. समाजात विविध कारणांमुळे काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अपघात, जन्मतः दोष, किंवा काही आजारांमुळे अनेक जण हात, पाय, ऐकण्याची किंवा बोलण्याची क्षमता गमावतात. या शारीरिक मर्यादा दिव्यांग व्यक्तीच्या शिक्षणात, नोकरीत, प्रवासात, समाजातील सहभागात त्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे या शिबिराच्या माध्यामातून या व्यक्तींचे पुनर्वसन करणे त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबवल्या आहेत. “दिव्यांगजन सशक्तीकरण योजना, “ALIMCO” या भारत सरकारच्या संस्था, तसेच सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन यांच्याद्वारे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या योजनांचा उद्देश केवळ सहाय्य करणे नाही, तर दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या गुणवत्तेचा समाजाच्या विकासात उपयोग करून घेणे आहे. या शिबिरात कृत्रिम पाय, कृत्रिम हात, व्हीलचेअर, ट्रायसायकल, हियरिंग एड्स, वॉकर, काठी इत्यादींची मोफत तपासणी व वाटप करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, डॉक्टरांची टीम, तांत्रिक सहाय्यक, आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले आहेत, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.




































