भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास आरोपींना नाहटा कॉलेज चौकापासून पुढील चौकापर्यंत पायी नेऊन गुन्ह्याशी संबंधित घटनाक्रमाची माहिती घेण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून हल्ला घडलेल्या ठिकाणांची, त्यावेळच्या हालचालींची तसेच गुन्हा घडण्यापूर्वी व नंतरच्या घटनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. तपासाच्या दृष्टीने ही पुनर्रचना महत्त्वाची मानली जात असून घटनास्थळाशी संबंधित विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, या खूनप्रकरणातील अद्याप तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके विविध ठिकाणी छापेमारी व शोधमोहीम राबवत आहेत.
यापूर्वी या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन्ही प्रमुख आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी चौकशी तीव्र करण्यात आली आहे.
या खूनप्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चौकट : फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम खूनप्रकरणातील उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांची पथके राज्यातील विविध ठिकाणी रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.






























