भुसावळ : नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दोन्ही बाजूंनी संयम बाळगून विकासाभिमुख भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
नेमाडे यांनी सांगितले की, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण केला जात असून हा विषय संबंधित शासकीय पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. समितीचा निर्णय येण्यापूर्वी सार्वजनिक आरोप करणे योग्य नसून त्यामुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर आरोप करण्यात वेळ घालवण्याऐवजी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आणि दर्जेदार रस्त्यांची मोठी गरज असून अनेक भागांत १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर स्थिती आहे. यासाठी ठोस नियोजन करून निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
शहरातील कचरा व्यवस्थापनही चिंताजनक बनले असून कचराकुंड्यांमधील कचरा मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावर पसरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीचा प्रभावी वापर होत नसल्याचा आरोप करत, कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडे असून त्यांनी आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, असा सल्ला त्यांनी दिला.
नेमाडे यांनी सत्ताधारी व विरोधकांनी “दोन पावले मागे” घेत शहराच्या विकासासाठी एकत्र काम करावे, असे आवाहन केले. आपत्कालीन प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा सल्ला देत, आमदार तथा मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून निधी मिळवून विकासकामांना गती द्यावी, तसेच माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अनुभवाचाही उपयोग करून घ्यावा, असे त्यांनी सुचवले.
नगरपालिकेच्या सभांमध्ये गोंधळ होण्याबद्दल खंत व्यक्त करत, निवेदन स्वीकारणे व त्यावर कारवाई करणे हा नगराध्यक्षांचा अधिकार असून प्रशासनानेही सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास कायद्याने दिलेले अधिकार वापरण्याचाही त्यांनी सल्ला दिला.
भुसावळ हे सर्वधर्मीय व सर्वजातीय लोकांचे “मिनी भारत” असल्याचे सांगत सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आवाहन करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. “जनतेला वाद नकोत, सुविधा हव्यात. लोकांची पिळवणूक थांबवा आणि विकासाला प्राधान्य द्या,” असे ठाम मत व्यक्त करत, परिस्थिती न सुधारल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही उमेश नेमाडे यांनी दिली.




































