सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
तासवडे येथील ‘मे. एस.के.एस. फाईन केम’ कंपनीत ३० मार्च २०२६ रोजी झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. हा स्फोट अपघात नसून कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आला होता.
मनविसेचे सातारा जिल्हा सचिव अमोल कांबळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत चौकशीची मागणी केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीत काही धक्कादायक मुद्दे मांडण्यात आले आहेत. कंपनीने स्फोटाच्या काही दिवसांपूर्वीच सेफ्टी ऑडिट पूर्ण केल्याचा दावा केला असतानाही स्फोट कसा झाला, हा ऑडिट केवळ कागदोपत्री होता का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच कंपनी परिसरात बेकायदेशीर विहीर बुजवून त्यात घातक रसायनांचे ड्रम गाडल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज व फॉरेन्सिक पुराव्यांची सखोल तपासणी करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती.
दरम्यान, तक्रारीची गंभीर दखल घेत एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच पोलीस प्रशासनाला पत्र पाठवून ‘विशेष तपास पथकाद्वारे’ चौकशीचे निर्देश दिले आहेत.
या कारवाईमुळे संबंधित कंपनी व्यवस्थापन आणि ऑडिट प्रक्रियेतील त्रुटींवर आता कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




































