पत्रकारांना निमंत्रण नाही, बसण्याची व्यवस्था नाही; रस्ता बंदीमुळे शेतकरी, विद्यार्थी व प्रवाशांचे हाल
भुसावळ प्रतिनिधी | यावल तालुक्यातील पाडळसे (अकलूद शिवार) येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि चोख नियोजनाचे दावे करण्यात आले होते. मात्र कथेच्या पहिल्याच दिवशी या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले. ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना साधे निमंत्रण देण्यात आले नाही, तसेच वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांसाठी बसण्याची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नसल्याने आयोजकांवर टीकेची झोड उठत आहे.
माध्यम प्रतिनिधींची गैरसोय
कथेसाठी लाखो भाविकांची गर्दी होत असताना, या कार्यक्रमाला प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसाठी व्यासपीठासमोर किंवा प्रेस गॅलरीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. अनेक पत्रकारांना गर्दीत उभ्यानेच वार्तांकन करावे लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कथेचे प्रक्षेपण होत असताना स्थानिक पत्रकारांच्या सोयींकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नियोजनावर प्रश्नचिन्ह
कथेपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पत्रकारांना साधी बसण्याची जागाही उपलब्ध झाली नाही. याबाबत आयोजकांकडे विचारणा केल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अचानक रस्ता बंदीचा निर्णय
दरम्यान, पाडळसे–अकलूद परिसरातील शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने अचानक रस्ता बंदीचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या असून न्हावी, आमोदा, बामनोद, फैजपूर आदी परिसरातील विद्यार्थी भुसावळ येथे शिक्षणासाठी ये-जा करत असल्याने त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांची नाराजी
रावेर, यावल व खेडगाव परिसरातील हजारो नागरिक दररोज या मार्गाने प्रवास करतात. मात्र रस्ता बंदीमुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. एका धार्मिक कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशासनाचा प्रतिसाद का मिळत आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आगामी दिवसांत पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.




































