भुसावळ – शहरातील अमृत योजना अंतर्गत पाणी टाकीचे काम गेले तीन महिन्यांपासून अचानकपणे थांबवण्यात आल्याने नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.महत्त्वाच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कोणतेही स्पष्ट कारण न देता बंद ठेवण्यामागे नेमका काय हेतू आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी (भाजप)च्या नगरसेवकांनी आज नगरपालिका वॉटर सप्लाय कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांचा घेराव केला.अमृत योजनेतील पाणी टाकीचे काम तात्काळ का थांबवण्यात आले, काम कधी सुरू होणार आणि विलंबास जबाबदार कोण,याबाबत नगरसेवकांनी जाब विचारला.
नगरसेवकांनी सांगितले की,अमृत योजना ही केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून,या योजनेतील कामे रखडल्यास शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काम थांबवण्यामागील कारणे स्पष्ट करावीत व तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
यावर मुख्याधिकारी यांनी नगरसेवकांना दोन दिवसांत संपूर्ण माहिती देऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.दोन दिवसांत कामासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली जाईल,तसेच अडचणी दूर करून काम सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल,असे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी सांगितले.
दरम्यान,दोन दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकल्पाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

























