भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणरायाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या आरतीचा मान विविध जाती-धर्मातील पत्रकारांना देण्यात आला. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी शहरातील पत्रकारांना आरतीसाठी आमंत्रित करून सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

यापुढे गणेशोत्सव काळात सायंकाळच्या आरतीसाठी शहरातील विविध क्षेत्रांतील अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पोलिस ठाणे आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आणि नागरिकांमध्ये नियमित संवाद आवश्यक आहे. गणेशोत्सवासारख्या सामाजिक आणि धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांच्या या उपक्रमामुळे सामाजिक एकोपा वाढण्यासोबतच नागरिकांचा पोलिसांशी संवाद वाढण्यास मदत होणार आहे. बाजारपेठ पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे शहरासह जिल्हाभरातून कौतुक होत आहे.



































