( भोर प्रतिनिधी :- संतोष मोहिते) समाजसेवेचा ध्यास घेत सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या उंब्रज (ता. कराड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीनाक्षीताई बबनराव पोळ यांचे नाव सातारा जिल्ह्यात आदराने घेतले जाते. महिलांवरील कौटुंबिक व सामाजिक अन्यायाविरुद्ध झुंजारपणे लढणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
सन २००६ पासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सातारा येथील निरीक्षणगृहात उंब्रज येथील पहिली इयत्तेतील नऊ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देत त्यांनी समाजकार्यात पहिले पाऊल टाकले. आज ही मुले पदवीधर झाल्याने त्यांच्या कार्याचे फळ समाजाला मिळाले आहे.
सन २००७ मध्ये सातारा जिल्ह्यातील विधवा, परितक्ता, निराधार, अपंग व तृतीयपंथीय नागरिकांना तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते सुमारे अडीच हजार रेशन कार्डचे वितरण करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
२००९ मध्ये त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. पती बबनराव रामचंद्र पोळ यांच्या अपघाती निधनानंतर दोन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आली. मात्र खंबीरपणे उभ्या राहत त्यांनी समाजकार्याचा घेतलेला वसा पुढे चालू ठेवला.
सन २०१० मध्ये उंब्रज व परिसरातील ८७ नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच उंब्रज येथे भव्य नेत्रतपासणी शिबिर आयोजित करून लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. उंब्रज पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
२०११ मध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करून देत त्यांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी मदत केली. महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण तसेच विविध कौशल्यविकास उपक्रम त्यांनी राबवले. उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली.
नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी संबंधित विभागांना निवेदने देत प्रसंगी आंदोलनाची भूमिकाही स्वीकारली. त्यांच्या कार्याची दखल घेत राज ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तसेच त्या नॅशनल कंज्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन व बांधकाम कामगार संघटना यांवर जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. तसेच पोलीस मित्र संघटना भारत सरकारच्या जिल्हाध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी गरजूंना मदत केली. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना कोरोना योद्धा, सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांची माऊली, नवदुर्गा अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून उंब्रज परिसरात मीनाक्षीताई पोळ यांचे नाव आज विश्वासाने घेतले जाते. मीनाक्षी ताई पोळ आज समाजसेवीका व कर्तव्यशिल महिला या नावाने सातारा जिल्हा मध्ये प्रसिद्ध आहे । यांना पोलिस वार्ता महाराष्ट्र टिम निलेश फिरके , रमाकांत मोरे मध्य प्रदेश , संतोष मोहिते भोर पुणे , राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली चे उप प्रमुख चंद्रशेखर जायसवार सहित अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी शुभेच्छा दिलेले आहे ।




































